विशाळगड व गजापुर गावामध्ये कट रचून धार्मिक स्थळ मस्जीद व अल्पसंख्याक मुस्लीम लोकांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी- एम.आय.एम.
नंदुरबार :- दि.१९ जुलै (फिरोज खान)-: रविवार, 14 जुलै 2024 रोजी विशाळगड व गजापुर जिल्हा कोल्हापूर येथे काही जातीयवादी लोकांनी मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या दर्गाह, मस्जिद वर तसेच निष्पाप मुस्लिम समाजातील लोकांवर विशेष करून महिलांवर भ्याड हल्ला केलेला आहे.
या हल्ल्त्यामध्ये दर्गाह, मस्जिदिचे तसेच मुस्लिम लोकांच्या घराचे व दुकानांचे दुका अतोनात आर्थिक नुकसान झालेले आहे. या भ्याड कृतीचा आम्ही सर्वप्रथम तीव्र निषेध करतो व ही कृती करणाऱ्या भ्याड हल्लेखोरांचा धिक्कार करतो.
विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि इतर चुकीच्या गोष्टींना आमचा अजिबात पाठिंबा नाही. विशाळगड येथील हजरत मलिक रेहान दर्गाह हे सर्वधर्मीय लोकांचे पवित्र स्थान आहे. येथील हजरत मलिक रेहान बाबांच्या दर्गाह वर हिंदू, मुस्लिम भाविकांची निस्सीम भक्ती आहे, येथील दर्गाह ही हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.
गडावरील काही घरे आणि दुकाने यांच्या अतिक्रमणाचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असताना आणि ते काढण्याबाबत मा. न्यायालयाने स्थगिती दिली असताना माजी खासदार छत्रपती संभाजी, रवींद्र पडवळ, बंडा साळोखे यांनी चिथावणी दिल्यामुळे जातीयवादी तरुणांनी एकत्र येऊन विशाळगडावरील पवित्र दर्गाहवर दगडफेक केली. हे वाईट कृत्य करून देखील गप्प न राहता दंगेखोरांनी विशाळगडाहुन परततांना गडाशेजारील गजापुर या गावामधील मस्जिद तसेच मुस्लिम लोकांवर आणि त्यांच्या घरावर, दुकानांवर भ्याड हल्ला केला, या हल्ल्यामध्ये स्थानिक मुस्लिम लोक गंभीररीत्या जखमी झालेले आहेत व लूटपाट केली गेली आहे.

त्याचप्रमाणे त्यांचे न भरून येणारे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे, हे कृत्य अत्यंत निंदनीय व बेकायदेशीर आहे. यामुळे महाराष्ट्रातील फक्त मुस्लिमच नाही तर हजरत मलिक रेहान बाबांच्या दर्गाहवर भक्ती असलेल्या सर्व भक्तगणांच्या धार्मिक भावना दुखाविल्या गेल्या आहेत.
मागे देखील पवित्र दर्गाहवर छोट्या तोफ सदृश्य यंत्राने फटाक्याचा बॉम्ब फोडून हल्ला करण्याचा प्रयत्न सांगलीचे माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही जातीयवादी तरुणांनी केला होता. गेल्या रविवारची दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी साधारण ४ दिवसांपूर्वीच ८ जुलै २०२५ रोजी माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विशाळगडावर महाआरतीचे नियोजन करण्यात आले होते त्यावेळी देखील त्यांनी तेथे उपस्थित लोकांना येथील दर्गाह, इस्लाम धर्म तसेच गडावरील स्थानिक रहिवाशांच्या विरुद्ध भडकावू भाषण देवून एक प्रकारची चिथावणी देण्याचेच काम केले होते.
जातीयवादी हल्लेखोरांना अश्या चीथावणीमुळेच हल्ला करण्याची प्रेरणा मिळाली आहे, त्यामुळे माजी आमदार नितीन शिंदे यांना या हल्ल्याला जबाबदार धरून त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करावी. दर्गाह वर झालेला हल्ला, महाआरती आणि माजी खासदार छत्रपती संभाजी यांनी त्यांच्या समर्थकांना 14 जुलै 2024 रोजी विशाळगडावर येण्याचे केलेले आवाहन यामुळे विशाळगड आणि परिसरात जातीयवादी लोकांकडून अश्या प्रकारचा हल्ला होवू शकतो याची पूर्वकल्पना असताना देखील कोल्हापूर पोलीस दलाने अत्यंत निष्काळजीपणे हे प्रकरण हाताळल्यामुळे हा पूर्वनियोजित हल्ला घडला आहे. त्यामुळे या निष्काळजीपणाला जबाबदार असणारे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
माजी खासदार छत्रपती संभाजी हे धर्म निरपेक्षतेचा पुरस्कार करणाऱ्या राजश्री शाहू महाराजांचे बारसदार मानले जातात, परंतु त्यांना शाहू महाराजांच्या विचारांचे विस्मरण झाले आहे, ही गोष्ट दुर्दैवी आहे.
शासनाने जमावबंदीचे आदेश लागू केले असताना बेकायदेशीरपणे जमाव जमविणे, त्याचप्रमाणे त्या जमावाला चिथावणी देणे असे बेकायदेशीर कृत्य त्यांच्याकडून घडले आहे,
त्यामुळे छत्रपती संभाजी यांच्याकडे यापूर्वी कोणते पद होते, ते कोणत्या घराण्याशी संबंधित आहेत याचा विचार न करता त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी कारण भारत हा संविधानानुसार व कायद्यानुसार चालणारा धर्मनिरपेक्ष देश आहे.
कायद्यापुढे सर्वजण एकसमान आहेत तसेच या हल्ल्यामध्ये जे ज्ञात, अज्ञात दंगेखोर सामील होते ते व राजेंद्र पडबळ व बंडा साळोखे नामक गुन्हेगार यांच्यावर देखील कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्याचप्रमाणे या प्रकरणाची गभीरपणे दखल घेवून त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मार्फत चौकशी करण्यात यावी.असा निवेदन आज नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे..